जळगाव (संपादक सुनिल पाटील) – उन्हाळी आणि दिवाळी सुट्टी हे बालरंगभूमीचे दोन्ही हंगाम यंदा कोरोना
टाळेबंदीमुळे कोरडे गेले. बालनाटय़ांचे सुरू असलेले प्रयोग तर थांबलेच आणि नवी बालनाटय़ेही येऊ शकली नाहीत. शिवाय, बालनाटय़ शिबिरे, अभिनय आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळाही रद्द कराव्या लागल्याने बालरंगभूमीवर दूरगामी परिणाम होणार आहेत.
अनेक संस्था दरवर्षी शाळांमध्ये आणि खासगीरीत्या बालनाटय़ शिबिरे भरवतात. नाटय़कलेत गती असणाऱ्या मुलांना घेऊन बालनाटय़े केली जातात. यातून भाषिक संस्कारांबरोबरच मुलांचा व्यक्तिमत्त्व विकासही साधला जातो. मात्र, यावर्षी लहान मुलांच्या घराबाहेर पडण्यावर कोरोनामुळे निर्बंध आले. बालनाटय़ांचे प्रयोग थांबले. परिणामी बालरंगभूमीचे सांस्कृतिक आणि आर्थिक नुकसान झाले. दर वर्षी दिवाळी सुट्टीत महाराष्ट्रात बालनाटय़ांचे ९० ते १०० प्रयोग होतात. त्यापैकी निम्मे प्रयोग मुंबई – पुण्यात, तर काही प्रयोग नाशिक तसेच संपूर्ण महाराष्ट्रात होतात. दिवाळीत होणाऱ्या प्रयोगांच्या दुप्पट बालनाटय़प्रयोग उन्हाळी सुट्टीत होतात, अशी माहिती बालनाट्य प्रशिक्षक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी दिली.
बालनाटय़ांद्वारे हजारो शब्द मुलांना नव्याने समजतात. त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासोबतच प्रसंगावधान येवून त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. आता दहावीची परीक्षा एप्रिल-मेपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. इतर इयत्तांच्या परीक्षा कधी होतील याबाबत काही सांगता येत नाही. महिन्याभरात बालनाटय़ उभे राहू शकत नाही, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे मराठी कच्चे असते, त्यामुळे त्यांच्याकडून भरपूर वाचन करून घ्यावे लागते. मुलांचे मन चंचल असते. इतक्या महिन्यांनंतर त्यांचे मन इतर गोष्टींकडे ओढले जाईल. त्यामुळे टाळेबंदीनंतर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल.
बालनाटय़ ही सांघिक कला असल्याने ती ऑनलाइन शिकवता येत नाही. सरावात मोठा खंड पडल्यानंतर कलेचे विस्मरण होऊ शकते, या सर्वांचा बालरंगभूमीवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता बालरंगभूमीवर काम करणाऱ्या लेखक दिग्दर्शकांकडून बोलून दाखविली जात आहे.







