ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – गेल्या तीन वर्षात ठाण्यात अपहरणाच्या गुन्ह्यात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. तीन वर्षात तब्बल 2 हजार 708 इतके अपहरणाचे गुन्हे पोलीस आयुक्तालयात दाखल करण्यात आले आहेत. परंतु, समाधानाची बाब म्हणजे दाखल गुन्ह्यपैकी 2 हजार 386 गुन्ह्यात यशस्वी तपास करून या प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, अपहरणाच्या एकूण गुन्ह्यांपैकी 85 टक्के गुन्हे हे 16 वर्षाखालील बालकांचे आहेत. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यास त्यांच्या मिसिंगची तक्रार ही अपहरण म्हणूनच दाखल करण्यात यावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे अपहरणाच्या दाखल गुन्ह्यातील आकडेवारीत वाढ होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाणे जिल्ह्यात वाढलेला गुन्ह्यांचा आलेख कमी करण्यात पोलिसांना यश आले असले तरी अपहरणांच्या प्रकरणांमध्ये मात्र गेल्या तीन वर्षात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ठाणे आयुक्तालय कार्यक्षेत्रात 2019 या वर्षी जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या काळात 938 अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. अपहरणाच्या नोंद झालेल्या घटनेपैकी 868 घटनांमध्ये पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून त्यांचा उलगडा केला आहे. तर 70 अपहरणांच्या गुन्ह्याचा माग शोधण्यास पोलिसांना अपयश आले आहे.
2018 मध्ये 969 अपहरण झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 826 गुन्ह्यातील आरोपींना पोलिसांनी यशस्वी तपास करून जेरबंद केले, तर 143 अपहरणांच्या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांना अद्याप देखील करण्यात आलेला नाही. एकूण अपहरणांच्या गुन्ह्यामध्ये 85 टक्के गुन्हे हे 18 वर्षाखालील मुलांबाबतीत असल्याची नोंद पोलीस दप्तरी सापड़ते. तर गेल्या पाच वर्षात लहान मुलांच्या अपहरणांच्या घटनांमध्ये तब्बल पाच पटीने वाढ झाल्याचे दाखल गुह्यांच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. अल्पवयीन मुले हरवल्यास अथवा बेपत्ता झाल्यास तो गुन्हा अपहरण म्हणूनच दाखल करण्यात यावा असे न्यायालयाचे आदेश आहेत. त्यामुळे अपहरणाच्या गुन्ह्यांची आकडेवारी वाढत असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात.
अपहरणांच्या दाखल गुन्ह्यात 85 टक्के गुन्हे हे लहान मुलांच्या अपहरणाचे आहेत. पूर्ववैमनस्य, खंडणी, भिक मागण्यासाठी आदी कारणांमुळे लहान मुलांचे अपहरण करण्यात येत असल्याच्या घटना अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पूर्ववैमनस्यातून अपहरण करण्याचे प्रमाण फार कमी असले तरी खंडणीसाठी व भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करण्यात येत असल्याच्या घटना पोलीस तपासात वेळोवेळी उघड झाल्या आहेत. लहान मुलांचे अपहरण करून त्यांना भिक मागण्याच्या कामाला लावणाऱ्या अनेक टोळ्या मुंबई, ठाणे परिसरात कार्यरत असल्याचा देखील संशय पोलिसांना आहे. या टोळ्या आपल्या हस्तकांमार्फत लहान मुलांचे अपहरण करतात. तर खंडणीसाठी देखील मोठ्या प्रमाणात अपहरण करण्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते.
प्रेम सबंध आणि कमी वयात एकमेकांबद्दल असलेले आकर्षण हे सुद्धा लॉकडाऊनमध्ये मिसिंग तक्ररी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरले आहे. अनेक दिवंसांच्या विरहामुळे भेटू न शकल्याने घरातून प्रेमाला विरोध होईल या भीतीने देखील अनेक मुले पळून गेल्याचे समोर आले आहे.







