नवी दिल्ली- भारतातील 20 सर्वोत्कृष्ट पोलीस स्थानकांच्या यादीत, मणिपूर राज्यातल्या नोंग्पोक्सेमाई ह्या पोलीस स्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तमिळनाडूच्या सालेम जिल्ह्यातल्या सुरमंगलम पोलिस स्थानकाला द्वितीय आणि अरुणाचल प्रदेशच्या चांगलाँग जिल्ह्यातल्या खारसंग पोलिस स्थांनाकाला तृतीय क्रमांकाने गौरवण्यात आले आहे.
देशातल्या टॉप-10 पोलीस स्टेशनमध्ये नोंगपोक सेमकई (थौबल, मणिपूर), एडब्ल्यूपीएस सुरमंगलम (सालेम, तमिलनाडू),खरसांग (चांगलांग, अरुणाचल प्रदेश),झिलमिल (सुरजापुर, छत्तीसगड),संगुएम (दक्षिण गोवा, गोवा),कालीघाट (अंदमान आणि निकोबार),पॉकयोंग ( सिक्किम),कांठ (मुरादाबाद, उत्तर प्रदेश),खानवेल (दादरा आणि नगर हवेली),जम्मीकुंटा टाउन (करीमनगर, तेलंगाना) या पोलीस स्टेशनचा समावेश आहे.
देशातल्या अनेक गंभीर गुंह्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी कामगिरी करणाऱ्या पोलिस स्थांनाकांचे सर्वेक्षण गृह मंत्रालयाने केले होते. कोविड19 च्या पार्श्वभूमीवर, दुर्गम भागातील पोलिस स्थानकांपर्यंत पोहोचणे, हे एक मोठं आव्हान असतानाही, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याची माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.
देशातील पोलिसांना अधिक परिणामकारकरीत्या त्यांचे काम करण्यासाठी उत्तेजन मिळावे आणि कार्यक्षमतेबाबत सर्व पोलीस ठाण्यांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण व्हावी या उद्देशाने भारत सरकार दरवर्षी देशभरात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पोलीस ठाण्यांची यादी जाहीर करत असते. पोलीस ठाण्यांची श्रेणी निश्चित करण्यासाठी काही मापदंड ठरविले जावे आणि पोलीस ठाण्यांच्या कामाचा अभिप्राय लक्षात घेऊन त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जावे असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये कच्छ इथे सन 2015 मध्ये भरलेल्या पोलीस महासंचालकांच्या परिषदेला संबोधित करताना दिले होते. त्या निर्देशांना अनुसरून ही यादी तयार केली जाते.
सर्वोत्तम पोलीस ठाण्यांची नावे निश्चित करण्यासाठी या वर्षी केंद्रीय गृह मंत्रालयाने आव्हानात्मक परिस्थितीमध्ये पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीचे सर्वेक्षण केले. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी हालचालींवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे या वर्षी दुर्गम भागातील पोलिस ठाण्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाले होते. त्यामुळे सरकारने याबाबत घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वेक्षण करण्यात आले.
देशातील हजारो पोलीस ठाण्यांमधून चाळणी प्रक्रियेनंतर निवड झालेल्या सर्वोत्तम 10 पोलीस ठाण्यांमधील बहुतांश पोलीस ठाणी छोट्या शहरांमधील किंवा ग्रामीण भागातील आहेत असे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी सांगितले आहे. गुन्ह्यांना आळा घालून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी साधनांची उपलब्धता महत्त्वाची असली तरी आपल्या पोलिसांचा प्रामाणिकपणा आणि कामाप्रती समर्पणाची भावना जास्त महत्त्वाची आहे असे मत शहा यांनी व्यक्त केले.







