शहाजहानपूर – उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमध्ये बुधवारी शेतीच्या वादात ‘दबंगांनी’ एका दलित कुटुंबावर गोळीबार केला. या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील इतर चौघे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसदलात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षकासह पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत दोन आरोपींना अटक केली आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना जलालाबाद पोलिस ठाण्यातील कसारी गावातील आहे. येथे प्रदीप नावाचा एक दलित युवक शेतावर काम करत होता. त्यावेळी गावातच राहणारे दबंग सोनू, देवेंद्र आणि अभिषेक यांनी या दलित युवकावर अचानक गोळीबार सुरू केला. या वेळी युवकावर लाठ्या-काठ्यांनी देखील हल्ला केला गेला. आरडाओरड ऐकून युवकाच्या कुटुंबाने घटनास्थळी दाखल होत त्याला वाचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीच या दबंगांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी लागून ४५ वर्षी द्रिगपाल यांचा मृत्यू झाला, तर तीन महिलांसह ४ लोक जखमी झाले.
गोळीबाराची बातमी पसरताच पोलिस विभागात खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने पोलिस अधीक्षक आनंद यांच्यासह इतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनेची पडताळणी केली. त्यानंतर लगेचच गोळीबार करणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली. सध्या जखमींवर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.







