उसन्या पैशाच्या वादातून मित्राची हत्या; आरोपीला जन्मठेप

arrested

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – उसने घेतलेले पाच हजार रुपये परत न केल्याने झालेल्या वादातून मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला बुधवारी ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. २०१५मध्ये ठाण्यातील वर्तकनगर परिसरात हे हत्याकांड घडले होते. मित्राचा मृतदेह घरातच ठेवून बाहेरून घराला कुलूप लावत आरोपी स्वत:च्या घरी निघून गेला होता. तीन दिवसानंतर हत्येचा प्रकार समोर आला होता.

केटरिंग व्यवसायात स्वयंपाकाचे काम करणारे सुधीर सिंग शास्त्रीनगरमध्ये कुटुंबासह राहत होते. ३१ जुलै २०१५ला सायंकाळी सुधीर घरातून बाहेर पडले. परंतु, रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी देखील ते घरी न परतल्याने पत्नीने वर्तकनगर पोलिस ठाण्यात धाव घेत पती बेपत्ता असल्याची तक्रारी केली. २ ऑगस्ट रोजी दुपारी सुधीर यांची पत्नी पोलिस ठाण्यात पतीच्या चौकशीसाठी गेली असता, त्याठिकाणी पतीचा मित्र अनिल वाल्मिकी आला. घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या अनिलने मित्र सुधीर यांची हत्या केल्याची कबुली दिली. अनिल हा सुधीर यांच्यासोबतच काम करत होता.

सुधीर यांनी अनिलकडून पाच हजार रुपये उसने घेतले होते. पैशांची वारंवार मागणी करूनही ते पैसे देत नव्हते. ३१ जुलैला रात्री दोघांनीही मद्यप्राशन केले. त्यानंतर अनिल हा सुधीर यांना वर्तकनगर परिसरात असलेल्या वसतिगृहामधील एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी उसन्या पैशांवरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर अनिलने सुधीर यांच्या डोक्यावर सत्तूरने वार केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून अनिल स्वत:च्या घरी निघून गेला. अनिलनेच दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी खोली उघडली असता आतून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती. पोलिसांना स्वंयपाक गृहात सुधीर यांचा मृतदेह आढळून आला.

वर्तकनगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अनिलला अटक केली. या प्रकरणाचा बुधवारी निकाल लागला. एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी अनिल याला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अॅड. वर्षा चंदने यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here