मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – मुंबईत एका 30 वर्षीय तरुणाची जमावानं लाठ्या-काठ्यांनी मारत हत्या केली. ही घटना शुक्रवारी सांताक्रुजला घडली.
जमावानं शहजाद खान या 30 वर्षीय तरुणाला इतकं मारलं, की त्याचा मृत्यू झाला. ही घटना सांताक्रूज पश्चिम भागातील मुक्तानंद पार्क इथं घडली. सध्या पोलिसांनी शहजादच्या भावानं दिलेल्या एफआयआरनुसार 6 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या मॉब लिंचिंगच्या प्रकरणाबाबत घटनास्थळाच्या आसपास राहणाऱ्यांचं म्हणणं आहे, की शहजाद खान हा तिथं मोबाईल चोरीच्या उद्देशानं आला होता. काही लोकांनी त्याला घेरून पकडलं आणि मारू लागले. शहजादच्या भावानं या सगळ्या आरोपांना नाकारलं. तो म्हणाला, की त्याचा भाऊ चोरीच्या उद्देशानं गेला नव्हता. भरवस्तीत घडलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ माजली होती.
भावानं मात्र सांगितलं, की माझा भाऊ ड्रग्ज घ्यायचा आणि तो बऱ्याचदा मुक्तानंद पार्ककडे जायचा. आपल्या दोस्तांसोबत तो तिकडं जाऊन ड्रग्ज घ्यायचा. तो सकाळी 4 वाजता निघाला होता. माझ्या आईला कुणीतरी सांगितलं, की शहजाद रस्त्यावर पडलेला आहे. हे कळताच आम्ही त्वरित घटनास्थळावर पोहोचलो आणि भावाला हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र तो वाचू शकला नाही. सध्या तरी मृत शहजादच्या भावाच्या सांगण्यावरून पोलिसांनी आयपीसीचं कलम 302, 342 आणि 34 नुसार केस दाखल करवून घेतली आहे. ही केस सांताक्रूज पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली गेली असून आता पोलीस पुढचा तपास करत आहेत.







