अरुणाचल प्रदेशच्या सीमेपर्यंत पोहचले चीनचे रेल्वेचे जाळे

china-border-railway

बीजिंग – आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या चीनकडून भारताच्या सीमेलगतच्या भागात वेगाने पायाभूत सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. भूटानच्या हद्दीत चीनने गाव उभारल्याचे समोर आले होते. आता, चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमा भागापर्यंत रेल्वे मार्ग टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. तिबेटच्या भागात छिंघाई-तिबेट रेल्वे मार्गानंतर आता शिचुआन-तिबेट हा दुसरा रेल्वे मार्ग ठरणार आहे. छिंघाई-तिबेट रेल्वे पठाराच्या दक्षिण पूर्व भागातून जाणार आहे. या भूभाग जमिनीतंर्गत भागात होणाऱ्या हालचालींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळेच हा रेल्वे मार्ग सुरू करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.

या रेल्वे मार्गामुळे चेंगदू आणि ल्हासा दरम्यान प्रवासासाठी लागणारा वेळ ४८ तासांहून १३ तासांवर आला आहे.नयीशिंगी भागाला लिंझी या नावाने ओळखले जाते. हा भाग अरुणाचल प्रदेश सीमेजवळ आहे. मागील महिन्यात चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अधिकाऱ्यांनी शिचुआन प्रांत आणि लिंझी यांना जोडणाऱ्या नव्या रेल्वे प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याची सूचना दिली होती. सीमा भागातील स्थिरतेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
या रेल्वे मार्गाची उभारणी तिबेट रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनीने केली असून या मार्गावर १६० किमी प्रती तास इतक्या वेगाने रेल्वे धावणार आहे. या ४३५ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावर ४७ बोगदे आणि १२० पूल आहेत. तिबेटची राजधानी ल्हासा आणि पूर्व तिबेटमधील नयींशगी यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे बांधकाम २०१४ मध्ये सुरू करण्यात आले होते. ९० टक्के रेल्वे मार्ग हा समुद्रसपाटीपासून ३००० मीटरहून अधिक उंचावर आहे. चीनने मागील काही वर्षांमध्ये सीमेलगतच्या भागात रेल्वे, रस्ते उभारणीवर भर दिला आहे. अक्साई चीन भागातही चीनने रस्ते बांधले आहेत. लडाखमध्ये भारत आपल्या हद्दीत करत असलेल्या बांधकामाला चीनकडून विरोध करण्यात येतो. चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाची स्थिती निर्माण होत असते.

दरम्यान, चीनने भारतासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या डोकलाम भागाजवळ बंकर आणि मजबूत रस्ते बांधले असल्याचे समोर आले. भारत-चीनचे सैन्य २०१७ मध्ये डोकलाममध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले होते. जवळपास ७० दिवस दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि चीन दरम्यान वाद झालेल्या क्षेत्रात चीनने सैन्य आणि दारूगोळा ठेवण्यासाठी बंकर बनवले आहेत. हे बांधकाम सिंचे-ला पासपासून जवळपास अडीच किमी अंतरावर आहे. सॅटेलाइट इमेजमधून याचा खुलासा झाला असून चीन या भागात आपली लष्करी ताकद वाढवत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here