बस्तर (छत्तीसगढ) – कुणा एकाच व्यक्तीशी आयुष्यभर एकनिष्ठ राहणं म्हणजे लग्न असं आपण मानतो. छत्तीसगढमध्ये मात्र एक चक्रावून टाकणारा प्रकार समोर आला आहे. छत्तीसगढमधल्या एका व्यक्तीनं एकाच वेळी एकाच मंडपात दोन जणींशी लग्न केलं. या दोघी त्या व्यक्तीच्या प्रेमिका आहेत असं समोर आलं आहे. या व्यक्तीचं नाव आहे चंदू मौर्य.
24 वर्षांचा चंदू मौर्य यानं एकाचवेळी दोघींशी केलेल्या या लग्नाची चर्चा सर्वदूर पसरली. चंदू यानं लग्नाच्या सगळ्या परंपरा आणि रितीरिवाज आपले कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत पूर्ण केले. 5 जानेवारी रोजी देवाधर्माच्या साक्षीनं लागलेल्या या लग्नात 500 लोक उपस्थित होते. दोन्ही महिलांना आपल्या प्रेमिका असल्याचं सांगत त्यानं त्यांच्याशी लग्न केलं.
चंदू म्हणाला, ‘मी या दोघी जणींशी लग्न करण्याचं ठरवलं, कारण या दोघीही माझ्यावर खूप प्रेम करतात. मी दोघींपैकी कुणाशीच दगाबाजी करू शकणार नव्हतो. माझं मन त्यासाठी तयार होत नव्हतं. या दोघी कायम माझ्यासोबतच एकत्र राहतील. सांगितलं जातं आहे, की या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे.
नक्षलवादानं ग्रस्त असलेल्या बस्तर जिल्ह्यात शेतकरी असलेल्या चंदू मौर्यनं सांगितलं, की त्याचा जीव टोकापाल भागातल्या 21 वर्षांच्या सुंदरी कश्यप या महिलेवर जडला. मौर्य या भागात विजेचे खांब लावण्यासाठी गेला होता. दोघांनी एकमेकांशी विवाहबद्ध व्हायचं ठरवलं. मात्र दरम्यानच्या काळात चंदूला हसीना बघेल नावाची दुसरीही एक महिला भेटली.
या हसीनाला चंदू म्हणाला, की तो आधीपासून एकीला लग्नाचं वचन देऊन बसला आहे. मात्र हसीना म्हणाली, की तिला याबाबत काहीच आक्षेप नाही. हसीना आणि सुंदरी या दोघींनाही मी याबाबत कल्पना दिली. त्यांना काहीच हरकत नव्हती. मग हे तिघं चंदूच्या घरी त्याच्या कुटुंबासह राहू लागले. आता लग्नावेळी हसीनाच्या घराचे आनंदानं या सोहळ्यात सहभागी झाले. सुंदरीच्या घरच्यांनी मात्र लग्नाला उपस्थित राहण्यास नकार दर्शवला.







