जमिनीच्या वादातून 50 हजारांची सुपारी देऊन मोठ्या भावाची हत्या

supari-killer

कोटा (राजस्थान) – जमिनीच्या वादामुळे लहान भावाने नातं विसरुन मोठ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात लहान भावाने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच 50 हजारांची सुपारी देऊन मोठ्या भावाची हत्या केली आणि त्याचं प्रेत विहिरीत फेकून दिलं. पोलिसांच्या सात दिवसांच्या तपासानंतर आरोपी लहान भावासह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

राजस्थान मधील कोटा जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ’31 डिसेंबरच्या रात्री कमल गुर्जर या आरोपीनं त्याचा मित्र विष्णू कुमारच्या मदतीनं मोठा भाऊ सत्यनारायण गुर्जर यांच्या हत्येचा कट रचला. या दोघांनी झालावाड जिल्ह्यातल्या ललन उर्फ निखिल आणि दीपक या सुपारी किलरच्या मदतीनं सत्यनारायण यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह शेतातील विहिरीमध्ये फेकून दिला.

पोलिसांना या प्रकरणाची माहिती समजताच त्यांनी त्यांच्या खबऱ्यांच्या मार्फत या प्रकरणाची माहिती गोळा केली. त्यावेळी मृत सत्यनारायण यांचा त्यांचा भाऊ कमलशी घर आणि शेतीच्या विभागणीवरुन वाद सुरु होता, ही माहिती त्यांना मिळाली. या माहितीनंतर पोलिसांनी कमलच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

कमल गुर्जरच्या हलचाली संशयास्पद आढळल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. या चौकशीमध्ये त्यानं मोठ्या भावाची हत्या केल्याचं मान्य केलं. मोठ्या भावाशी होणाऱ्या वादाला कंटाळून ही हत्या केल्याचं त्यानं सांगितलं.

‘कमलनं त्याचा मित्र विष्णू कुमारच्या माध्यमातून निखील आणि दीपक या सुपारी किलरशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम 2 लाख 50 हजारांची मागणी केली. त्यानंतर 50 हजारांवर त्यांच्यातील ‘सौदा’ निश्चित झाला’, अशी माहितीही कमलच्या जबानीतून उघड झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात कमल, विष्णू कुमार, निखील आणि दीपक या चौघांना अटक केली आहे. या प्रकरणातले दोन संदिग्ध आरोपी अजूनही फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here