नागपूर येथील समाजकल्याण अधिकारी लाच घेताना अटकेत

bribe

वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – कनिष्ठ लिपिकपदी कायमस्वरूपी नियुक्ती देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. अनिल श्रावण वाळके (वय ५६, रा. मनीषनगर) असे अटकेतील अधिकाऱ्याचे नाव आहे. वाळके यांच्याकडे समाजकल्याण अधिकाऱ्याचा अतिरिक्त कारभार आहे.

कोराडीतील महादुला येथे विशेष निवासी शाळा आहे. येथे तक्रारदाराला अनुकंपा तत्त्वावर कनिष्ठ लिपिकाची नोकरी लागली. त्याने परिविक्षाधीन कालावधी पूर्ण केला. तक्रारदाराने कायमस्वरूपी नियुक्तीसाठी समाजकल्याण अधिकाऱ्यांमार्फत समाजकल्याण विभाग प्रादेशिक उपायुक्तांकडे प्रस्ताव सादर केला. त्यात त्रुटी काढून तो परत पाठविण्यात आला. तक्रारदाराने सुधारित प्रस्ताव वाळके यांना सादर केला. मात्र, वाळके यांनी हा प्रस्ताव उपायुक्तांकडे पाठविला नाही. त्यामुळे तक्रारदाराने वाळके यांची भेट घेतली.

प्रस्ताव व मार्च २०२०पासूनचे थकीत वेतन काढण्यासाठी वाळके यांनी तक्रारदाराला ५० हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप जगताप, हेडकॉन्स्टेबल प्रवीण पडोळे, शिपाई प्रभाकर बेले, राहुल बारई व शारिक शेख यांनी जिल्हा परिषदेत सापळा रचला. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत वाळके यांच्या घराची झडती सुरू होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here