प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांचं नेतृत्व करणाऱ्या फ्लाइट लेफ्टनंट स्वाती राठोड या पहिल्या महिला वैमानिक ठरणार
नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी भारताच्या हवाई दलात एक नवा इतिहास घडणार आहे. यंदा दिल्लीच्या राजपथावर होणाऱ्या हवाईदलाच्या फ्लायप्लास्टचं म्हणजे भारतीय हवाई दलाची विमानं विशिष्ट पद्धतीनं उड्डाण करून देशाला सलामी देतात. मनोवेधक कसरती करतात. या सगळ्या कार्यक्रमाचं नेतृत्व फ्लाइट लेफ्टनंट स्वाती राठोड करणार आहेत. हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला वैमानिक असून, यानिमित्तानं एक नवा इतिहास त्या घडवणार आहेत. राजस्थानमधील रहिवासी असलेल्या या युवतीचं राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह अनेक राजकीय नेते तसंच सर्वसामान्य जनतेनंही कौतुक केलं आहे.
राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या स्वाती राठोड यांनी अजमेरमधून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षणानंतर स्वाती एनसीसी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या एअर विंगमध्ये सामील झाल्या. त्याचवेळी स्वाती यांना याच क्षेत्राची आवड असल्याचं तिच्या पालकांच्या लक्षात आलं होतं. त्यांनीही तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं. एनसीसीमध्ये असताना स्वातीनं नेमबाजीत सुवर्णपदकही जिंकलं होतं. 2013 मध्ये तिनं एअरफोर्सची कॉमन अॅडमिशन परीक्षा दिली.
‘स्वाती यांना नेहमीच भारतीय हवाई दलात जाण्याची इच्छा होती. त्या लहान असताना जेव्हा केव्हा चित्र काढत असे, तेव्हा विमानाचीच चित्रं काढत असे. म्हणूनच त्यांनी एनसीसीत प्रवेश घेतला, असं तिच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. त्यांच्या आई म्हणाली की, ‘त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला कधीही वेगळी वागणूक दिली नाही. दोघांमध्ये भेद केला नाही आणि म्हणूनच त्यांची मुलगी आज इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे.’
स्वाती राठोड यांनी हवाई दलात पायलट होण्याचे स्वप्न बाळगले होते आणि 2014 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ते साध्य केलं. भारतीय हवाई दलात त्यांची निवड झाली. स्वाती यांचा भाऊ मर्चंट नेव्हीमध्ये आहे. 2013 मध्ये भारतीय हवाई दलाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना मार्च 2014 मध्ये डेहराडून इथं भारतीय हवाई दलाच्या निवड मंडळानं मुलाखतीसाठी बोलावलं. देशभरातून सुमारे 200 विद्यार्थिनी तिथं उपस्थित होत्या, त्यापैकी 98 मुलींची स्क्रीनिंगसाठी निवड झाली. स्क्रीनिंगनंतर केवळ पाच मुली अंतिम टप्प्यात पोहोचल्या होत्या, त्यातून फक्त स्वाती यांची हवाई उड्डाण शाखेत निवड झाली. तिच्या या कामगिरीनं राज्यातील सर्व नेत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं.







