रांगणा किल्ल्यावर पार्टी करण्यासाठी आलेल्या ग्रुपमधील तरुणाला मारहाण

rangna-fort-case

मारहाण करणाऱ्या चौघांना नंतर गावकऱ्यांनी दिला चोप : भुदरगड पोलिसात गुन्हा दाखल

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – रांगणा किल्ल्यावर बकरा घेऊनच पार्टी करायला आलेल्या काहींना ‘त्या’ चौघांनी काठीने मारहाण करत नाक घासायला लावले. त्यांची ही कृती नंतर त्यांच्या अंगाशी आली. किल्ल्यावरून गावात येताच ग्रामस्थांनी त्यांनाही बेदम चोप दिला, शिवाय याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चार युवक फिरायला रांगणा किल्ल्यावर गेले होते. त्यावेळी तिथे काहीजण दारू आणि बकरा घेऊन पार्टी करायला आल्याने वादाची ठिणगी पडली. पार्टीच्या तयारीने आलेल्या ग्रुपकडे पाहून किल्ल्यावर दारू पिण्यास बंदी आहे, हे माहीत आहे का, अशी विचारणा चौघांनी त्यांना केली व पार्टी करायला आलेल्यांपैकी एकास चांगलाच चोप दिला. काठीने मारहाण करत त्याला जमिनीवर नाक घासायला लावले व माफीही मागायला लावली. शिवप्रेमी आहोत, असे म्हणत त्यांनी त्यांना शिवीगाळही केली. हे सारे मोबाइलवर शूटिंग करून त्यांनी व्हायरलही केले. युवकाला झालेल्या मारहाणीत तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावे लागले आहे.

दरम्यान, मारहाणीत आपल्याच गावातील युवक जखमी झाल्याचे कळताच ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांनी मारहाण करणाऱ्या त्या चार युवकांचा शोध घेतला व कोल्हापूरला परतत असताना ग्रामस्थांनी त्यांना गाठले. चौघांनाही नंतर खोलीत कोंडून बेदम मार दिला गेला व नाक घासून माफीही मागायला लावले. त्यांच्यावर भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे स्टंटबाजी करणाऱ्या ऋषीकेश माने, प्रसाद माने, उमेश माने आणि विजय गुरव या चौघांना आता पोलीस ठाण्याची हवा खावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here