लखनौ – मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दिरंगाई होत असल्याने बिहारचे राजकारण चांगलेच तापले आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधी पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या दरम्यान, एआयएमआयएम पक्षाच्या पाच आमदारांनी नुकतीच मुख्यमंत्री नितीश कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला.
यावरच बोलताना आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले आहेत की, ‘नवीन सरकार स्थापित होऊन अनेक महिने लोटले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात दिरंगाई झाल्यामुळे सरकारची सर्व कामे ठप्प झाली आहेत. आता उशीर का होत आहे, हे तर आता तेच सांगतील जे चोर दरवाज्यातून सत्तेत आले आहेत.’ आरजेडी प्रवक्ते मृत्युंजय मिश्रा म्हणाले की, ‘बिहारमध्ये ज्यादिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार, त्याच दिवशी पडणार सरकार.’
आज एआयएमआयएम पक्षाच्या पाच आमदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली. या पाचही आमदारांनी नितीश कुमार यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र त्यांनी जेडीयूने भाजपची साथ सोडावी अशी अट ठेवली आहे. जेडीयू जोपर्यंत भाजप युतीमध्ये राहणार तोपर्यंत समर्थनाचा विचार केला जाणार नसल्याचे या आमदाराचे म्हणणे आहे.







