भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील तलाठी आणि कोतवाल यांना उतार्यावरील बोजाचे नाव कमी करण्यासाठी अवघ्या २४० रूपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कुर्हे पानाचे येथील एका शेतकर्याला आपल्या उतार्यावरील बोजा कमी करायचा होता. यासाठी तलाठी प्रविण श्रीकृष्ण मेश्राम (वय-४१. व्यवसाय- तलाठी कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ जि. जळगाव) व कोतवाल प्रकाश दामू अहीर (वय-४५. कोतवाल तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे रा.अंबिका नगर कुऱ्हे पानाचे ता.भुसावळ जि.जळगाव) यांनी शेतकर्याकडे लाच मागितली. याबाबत तडजोड होऊन २४० रूपये देण्याचे ठरले. दरम्यान, संबंधीत शेतकर्याने याबाबत जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनुसार एसीबीचे उपअधिक्षक गोपाल ठाकूर यांनी पो. नि. निलेश लोधी, पो.नि. संजोग बच्छाव, सफौ. रविंद्र माळी, पोहेकॉ. अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, पोहेकॉ. सुरेश पाटील, पोना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना. जनार्धन चौधरी, पोकॉ. प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ. ईश्वर धनगर यांनी पथकाची नियुक्ती केली. या पथकाने आज दुपारी एकच्या सुमारास तलाठी प्रवीण मेश्राम व कोतवाल प्रकाश अहिरे यांना २४० रूपये स्वीकारताना अटक केली. याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.







