वर्धा (जिल्हा प्रतिनिधी मनोज बाचले) – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे शिवसेनेचे विदर्भातील नेते आणि मंत्री संजय राठोड अडचणीत सापडले आहे. भाजपने या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. तर दुसरीकडे संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाजाने काढलेला मोर्चा रद्द केला आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे आज बंजारा समाजाच्या वतीने संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहेत आणि त्यांना लक्ष्य केले जात आहे, कुठेतरी समाजाची बदनामी केली जात आहे. त्यामुळे बदनामी करण्याचा कट केला जात आहे, असे मत बंजारा समनव्य समितीने व्यक्त केले होते.
त्यामुळे आज संजय राठोड यांच्या समर्थानार्थ पुसद येथे मोर्चा काढण्यात आला होता. मात्र हा मोर्चा कार्यकर्त्यांची गर्दी न जमल्यामुळे रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. याबद्दल आंदोलकांना विचारले असता तर त्यांनी सांगितले की, ‘अनेक ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांच्या परत मेसेज पोहोचला नाही आणि त्यामुळे कार्यकर्ते जमले नाही.’
परंतु, मोर्चामध्ये दोन गट पडल्याने कार्यकर्ते जमले नाही. आता तैनात असलेले पोलीस सुद्धा परत गेले आहे. शेवटी चार जणांचे शिष्टमंडळ हे तहसीलदार यांच्याकडे जाऊन निवेदन देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. गर्दीच न जमल्यामुळे मोर्चा रद्द करण्याची नामुष्की मात्र आयोजकांवर ओढवली आहे.




