वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील दाम्पत्याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. १२) दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राजेश सोहनलाल गुप्ता (वय ६०) आणि संध्या राजेश गुप्ता (वय ५५) अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरेड बसस्थानकानजीक असलेल्या माँ वैष्णोदेवी कॉम्प्लेक्स येथे ते वास्तव्याला होते. राजेश गुप्ता यांचे नगर परिषदेच्या संताजी जगनाडे व्यावसायिक संकुलात विजय ट्रेडर्स नावाने हार्डवेअरचे दुकान आहे. त्यांना विवाहित मुलगी व अविवाहित विजय नावाचा मुलगा आहे. मुलगा काही कामानिमित्त नागपूरला गेला होता.
राजेश गुप्ता व संध्या हे दोघेही घरीच होते. दोघेही अनेक दिवसांपासून आजारी होते. तसेच कर्जबाजारी असल्याची चर्चा आहे. पोलिस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. ‘मुलांनो, आम्हाला माफ करा’ या आशयाची चिठ्ठी लिहून ठेवल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुलगा विजय काही कामानिमित्त नागपूरला गेला होता. काम पडल्यामुळे त्याने वडिलांना फोन केला. मात्र, वडिलांनी फोन उचलला नाही. घाबरलेल्या विजयने मित्राला फोन करून घरी जाण्यास सांगितले. मित्राने घरी जाऊन बघितले असता दरवाजा उघडा होता. यावेळी मित्राचे आई-वडील दोघेही मृतावस्थेत आढळून आले. तोंडातून फेस आला होता. त्याने तत्काळ पोलिस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले.
मृत राजेश यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली होती. चिठ्ठीत ‘आम्ही दोघे स्वर्मजीने आत्महत्या करीत आहे. यासाठी कुणालाही जबाबदार धरू नका. मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ असे लिहिले होते.




