वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनोळखी चार ते पाच व्यक्तींनी 11 महिलांकडून प्रोसेसिंग शुल्काच्या नावावर 45 हजार रुपयांनी फसवणूक केली. ही घटना आर्वी तालुक्यातील सावळापूर परिसरात उघडकीस आली.
सीमा मुकुंद गायकवाड यांच्या तक्रारीनुसार, गावात दोन महिला आणि एक पुरुष, असे तिघे जण आले होते. त्यांनी आम्ही महिला सोसायटी नागपूर येथील संस्थेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. महिलेने स्वत:चे नाव वनिता बन्सोड आणि अंजली अली, असे सांगितले. त्यांनी तुमच्या गावात महिलांचा गट तयार करा, आम्ही तुम्हाला कर्ज उपलब्ध करून देतो, असे सांगितले. त्या दिवसापासून ते तिघे गावात येऊ लागले. सीमा गायकवाड यांनी 11 महिलांचा गट तयार केला. पॅनकार्ड नसल्याने कर्ज मंजूर होणार नाही, असे सांगून एक हजार रुपयाप्रमाणे 11 हजार रुपये दिले.
तीन ते चार दिवसांनंतर त्यांनी पॅनकार्ड आणून दिले. त्यानंतर प्रोसेसिंग शुल्क आणि इन्शुरन्ससाठी प्रत्येकी चार हजार रुपये लागतील, असे सांगितले. त्यानुसार सहा महिलांनी एक लाख रुपयांच्या कर्जासाठी 24 हजार रुपये, तर पाच महिलांनी 50 हजारच्या कर्जासाठी 10 हजार रूपये, असे एकूण 34 हजार रुपये त्यांना दिले. तुमच्या बँक खात्यात कर्जाची रक्कम जमा होईल, असे म्हणून ते निघून गेले. काही दिवसांनी ते फोन उचलत नसल्याने महिलांनी चौकशी केली असता, वाढोणा येथील लोकांनाही असेच फसविल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने सीमा गायकवाड यांनी आर्वी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.







