पदुच्चेरी – काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे अल्पमतात आलेल्या सरकारचा प्रश्न उभा ठाकला असतानाच नायब राज्यपाल किरण बेदी यांना पदावरून हटविण्यात आले. तेलंगनाचे राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मुख्यमंत्री नारायनसामी यांच्याशी असलेल्या मतभेदातून बेदी यांच्यावर कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
१० फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री. नारायणसामी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना बेदी यांच्यासंदर्भात पत्र पाठवलं होतं. त्या पत्रात बेदी यांना परत बोलवून घ्यावे, अशी विनंती केली होती. बेदी यांचा कारभार तुघलकी असल्याचा आरोप मुख्यमंत्री नारायनसामी यांनी केला होता. बेदी यांना पदावरुन हटवण्याआधीच पुदुच्चेरीमधील काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्याने बेदींना हटवण्यामागील नक्की कारण काय याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. मे २०१६ रोजी बेदी यांची नायब राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली होती.
पुदुच्चेरीत व्ही. नारायणसामी मुख्यमंत्री असलेले काँग्रेसचे सरकार आहे. पण काँग्रेस आमदार ए जॉन कुमार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने पुदुच्चेरीतील काँग्रेसचे सरकार अल्पमतात आले आहे. ए. जॉन कुमार हे कामराज नगरमधून पोटनिवडणुकीत २०१९ मध्ये विजयी झाले होते. दरम्यान, आज निवडणुकच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी राहुल गांधी पदुच्चेरीत जाणार आहेत.






