…तरच मिळणार दिल्लीत प्रवेश; दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली – देशातील करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतांना दिसत आहे. वाढत्या रुग्नांची संख्या लक्षात घेता दिल्ली सरकार अलर्ट झाले आहे. आता महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि पंजाब पाच राज्यांमधून दिल्लीत येणाऱ्या लोकांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. करोना संक्रमणा दरम्यान पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता दिल्ली सरकारनं हा निर्णय घेतलाय. आता पाच राज्यांतून दिल्लीला येणाऱ्या नागरिकांना करोना निगेटिव्ह रिपोर्ट सोबत घेऊन येणं अनिवार्य असणार आहे.

महाराष्ट्रात करोनाचा बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. महाराष्ट्रासोबतच केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि पंजाबमध्येही बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे आता दिल्ली सरकारने या राज्यांतून येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध लागू केले आहेत. या पाचही राज्यांतून दिल्लीत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना निगेटिव्ह आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट अनिवार्य केलं आहे. म्हणजेच दिल्लीत जाणाऱ्या नागरिकांनी आपला निगेटिव्ह आरटी-पीसीआर टेस्ट (RT-PCR) रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. दिल्ली सरकारने लागू केलेला हा नियम २६ फेब्रुवारी पासून ते १५ मार्च २०२१ पर्यंत लागू असणार आहे. राज्याच्या सीमेवर कोरोनाची चाचणी केली जाईल. यासाठी आशारोडी चेकपोस्ट, रेल्वे स्टेशन आणि विमानतळांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.

मागील २४ तासांतील करोना बाधित रुग्णांची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासांत १३ हजार ७४२ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचं चाचणी अहवालातून निष्पन्न झालं आहे. तर १०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १०४ मृतांबरोबरच देशातील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १,५६, ५६७ इतकी झाली आहे. २४ तासांच्या कालावधीत १४ हजार ३७ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here