सातारा ( प्रतिनिधी ) – आजही या देशात अंधश्रद्धेचे बळी जाताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. माण तालुक्यातील शिंदी येथील १४ वर्षाच्या मुलीला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला. दोन भोंदूबाबांनी तिला भूतबाधा झाल्याचे सांगितले होते.
मिळालेल्या माहितीनुसार त्या मुलीला ताप आला होता. तिला तिच्या पालकांनी रुग्णालयात नेण्याऐवजी देवऋषाकडे नेले. त्यांनी तिच्यावर तंत्र-मंत्र करुन तिला घरी पाठवले आणि त्याच रात्री तिचा मृत्यू झाला. अंधश्रद्धेतून १४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीसांनी दोन भोंदूबाबांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही भोंदूबाबांना अटक केली.
या भोंदूबाबांनी तिच्यावर तंत्र-मंत्र आणि अंगारे धुपारे केले. मात्र तिच्या घरच्यांनी तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला नाही आणि तिचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यावर कहर म्हणजे तिच्या आईवडीलांना तिचा मृतदेह परस्पर पुरुन सुद्धा टाकला. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.






