क्रांतीविरांचे शिरोमणी चंद्रशेखर आझाद

    मुंबई (संपादक सुनिल पाटील)
    ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी’ या क्रांतीकारी संघटनेचे नेतृत्व स्वीकारल्यावर चंद्रशेखर आझाद यांनी अनेक तरुणांना सशस्त्र क्रांतीकार्याकडे वळवले. त्यांनी ‘काकोरी कट’, ‘साँडर्स वध’, केंद्रीय विधीमंडळातील बाँबफेक असे कट सिद्धीस नेले. इंग्रजांच्या गराड्यात सापडलेल्या या क्रांतीसूर्याने अखेरीस स्वतःवर गोळी झाडून ‘आझाद’ हे नाव सार्थ ठरवले.
    जन्म : २३ जुलै १९०६, भाबरा, शौर्यशाली आत्मार्पण : २७ फेब्रुवारी १९३१, अलाहाबाद

    चंद्रशेखर आझाद यांचा जन्म मध्यभारतातील झाबुआ तहशिलीतील भाबरा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पंडित सीताराम तिवारी, व मातेचे नाव जगदानीदेवी असे होते. बनारसला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला, व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्रीप्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतिची दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजल्या, त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.

    साँडर्सचा बळी घेतल्यावर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेष पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंताचा चेला बनले होते. कारण की, या महंताजवळ पुष्कळ द्रव्य होते. ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते, परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून दिला. पुढे ते झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तूलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले.

    काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. वर वर पाहणार्‍याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले आहे असे वाटे.

    गांधी आयर्वीन करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठविला की, आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी, असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल, परंतू गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले.”मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’,ही आझादांची प्रतिज्ञा होती. २७ फेब्रुवारी १९३१ ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले,” अरे शिपाई भाईंओ, तुम लोग मेरे ऊपर गोलियाँ क्यों बरस रहे हो ? मै तो तुम्हारी आजादी के लिये लढ रहा हूँ ! कुछ समझो तो सही !”इतर लोकांना ते म्हणाले,” इधर मत आओ ! गोलियाँ चल रही है ! मारे जाओगे ! वंदे मातरम् ! वंदे मातरम् !”

    आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले.

    नॉट बॉबर म्हणाला, ” असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत !”

    पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह आल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला, असा अपप्रचार करीत, तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला. पण पंडीत मालवीय, सौ. कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळलेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. २८ फेब्रुवारीला त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून एका विराट सभेत सर्व पुढार्‍यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

    क्रांतीविरांचे शिरोमणी चंद्रशेखर आझाद यांना विनम्र अभिवादन !
    (संकलक : प्रशांत जुवेकर, हिंदू जनजागृती समिती, जळगाव, संपर्क क्र. : 9552426439)

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here