कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – समाजातल्या जात पंचायती बरखास्त करून लोकशाही मार्गाने न्यायालयात न्यायनिवाडा व्हावा यासाठी कायदा झाला, पण अजूनही काही समाजात जातपंचायती भरतात आणि निवाडे होतात. असंच एका प्रेम विवाहातून घटस्फोटापर्यंत पोहोचलेला खटल्यात निवाडा करण्यासाठी चक्क कोल्हापूर शहरात जात पंचायत भरली. कोल्हापुरातील न्यायसंकुलापासून काही मीटर अंतरावर बसलेल्या या पंचायतीत मुलगीवर दबाव आणून घटस्फोट घेण्याची सल्लावजा धमकी देण्यात आली.
कोल्हापूरच्या न्यायसंकुलापासून काही मीटर अंतरावर एका झाडाखाली कंझारभाट समाजाची पंचायत बसली. याठिकाणी पुणे येथील मुलगी आणि कोल्हापूर येथील मुलाने केलेल्या प्रेमविवाहाचा घटस्फोट करुन देण्याचे काम सुरू होते. मुला मुलीने वर्षभरापूर्वी प्रेमविवाह केला होता. मुलाच्या घरी मुलगी राहू लागली. पण तिला वारंवार छळ सुरू झाल्याने मुलगी माहेरी निघून गेली. सध्या मुलाच्या घरच्यांकडून मुलीकडे सोडचिठ्ठी देण्याची मागणी केली जात होती. आज तर या प्रकरणी चक्क जात पंचायत बसवण्यात आली. मुलीची इच्छा नसतानाही तिच्यावर दबाव आणून तिला घटस्फोट देण्याचा आग्रह जात पंचायत करत होती.
याठिकाणी मुलीला ठरल्याप्रमाणे साडेतीन लाख रुपये व्यवहार पूर्ण करून घटस्फोट दे, असं सांगितले जात होतं. पंचायत म्हणत होती आम्ही पंच आहोत कोणी ऐरेगैरे नथ्थुखैरे नाही. आम्ही सांगतोय त्यानुसार घटस्फोट दे… पण मुलीने जे काय बोलायचे असेल ते मी कोर्टात बोलीन असे सांगितलं.
दरम्यान, याबाबत कोल्हापूर पोलीस ठाण्यात अजून कुठलीही तक्रार दाखल झाली नसून मुलीला विश्वासात घेऊन जात पंचायती विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक समाज आजही गुण्यागोविंदाने राहतात, एकमेकांना मदत करतात. पण अंधश्रद्धा रूढी परंपरा या समाजात आजही पाहायला मिळतात. त्यामुळे अशा जात पंचायतींवर पोलिसांनी, जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करणे गरजेचं आहे.






