नवी दिल्ली – इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लागू झालेली आणीबाणी चुकीची होती, असं त्यांचे नातू आणि काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. कॉर्नेल विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बुधवारी कौशि बसु यांच्यासोबत व्हर्च्युअल चर्चेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं. पण केंद्रातील विद्यमान मोदी सरकारचा संदर्भात देत त्यांनी हे वक्तव्य केलं. आणीबाणी चुकीची होती, पण त्यावेळी जे झालं आणि आज देशात जे होतंय या दोन्हीत फरक आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक संरचना बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्या पक्षाच्या रचना आम्हाला असं काही करण्याची परवानगी देत नाही. इच्छा झाली तरीही आम्ही असं करू शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसने कधीही संस्थांचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केला नाही. पण विद्यमान सरकार भारताच्या लोकशाही व्यवस्थेला नुकसान पोहोचवत आहे. प्रत्येक संस्थेच्या स्वायत्ततेवर हल्ला केला जातोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त यंत्रणांवरही एका विचारधारेचा पगडा आहे. माध्यमांपासून ते कोर्टापर्यंत सर्वांना लक्ष्य केलं जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
संसदेत चर्चेवेळी माइक बंद केला जातो. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. लोकशाहीवर मोठा हल्ला होतोय. मणिपूरमध्ये राज्यपाल भाजपची मदत करत आहेत. पुदुच्चेरीत राज्यपालांनी अनेक विधेयकं मंजूर होऊ दिली नाहीत. कारण ती आरएसएसशी संबंधित होती. भारतात आता हुकूमशाही सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.






