पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याच्या संतापातून ‘त्याने’ चौकीच पेटवून दिली

fire

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – सूर नदीपात्रातून बेसुमार रेती उपशाला अटकाव करण्यासाठी बांधलेल्या पोलिस चौकीतील कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याच्या संतापातून एकाने चौकीच पेटवून दिली. आग लावण्यावेळी चौकीत कुणीही नसल्याने मोठा अनर्थ ठळला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भंडारा-करडी मार्गावरील बेलगाव येथे उघडकीस आली.

बाळकृष्ण मारवाडे रा. खमारी, असे चौकी पेटविणाऱ्याचे नाव आहे. जिल्ह्यात वैनगंगा, बावनथडी, सूर आदी नदी पात्रांमधून रेतीचा बेसुमार उपशा सुरू आहे. दिवस-रात्र ट्रक, टिप्पर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने रेतीची वाहतूक केली जाते. हा प्रकार थांबविण्यासाठी पोलिस विभागाने ठिकठिकाणी पोलिस चौकी बसविली आहे. परंतु, रेतीमाफियांचे लागेबांधे थेट मुंबईपर्यंत असल्याने रेतीची चोरटी वाहतूक अहोरात्र सुरूच आहे.

भंडारा-करडी मार्गावर खमारी, मांडवी, ढिवरवाडा, मुंढरी, कन्हाळगाव, कोथुर्णा आदी वैनगंगा नदीचे रेतीघाट आहेत. या घाटांवर दररोज रेतीचा उपसा आणि वाहतूक सुरू असल्याने बेलगावच्या टोकावर पोलिस चौकी बसविण्यात आली आहे. रेतीच्या वाहतुकीवर प्रतिबंध लावण्यासाठी याठिकाणी पोलिसांची नियुक्ती असते. या चौकीत कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीसाठी तीन बेडची व्यवस्था होती.

दोन-तीन दिवसांपूर्वी येथील पोलिस कर्मचाऱ्यांसोबत बाळकृष्ण मारवाडे याचा वाद झाला होता. त्याचा राग बाळकृष्णच्या मनात होता. या रागातूनच त्याने दारूच्या नशेत गुरुवारी मध्यरात्री पोलिस चौकी पेटवून दिली. त्यावेळी चौकीत कुणाचीही ड्युटी नसल्याने अनर्थ टळला. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासाअंती बाळकृष्ण मारवाडे यानेच चौकी पेटविल्याचे दिसून आल्याने त्याला अटक करून गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here