रांची – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या हाती सत्ता गेल्याने देशात जातीयवादाचे विष वाढत आहे, असा आरोप शरद पवारांनी केला. शेतकऱ्यांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान मोदींना विदेश दौऱ्यांसाठी वेळ आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी वेळ आहे. पण २० किमी अंतरावर असलेल्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी मोदींना वेळ नाहीए, अशी टीका शरद पवार यांनी केली.
बिरसा मुंडा यांच्या पवित्र भूमीत आलो, हे आपले भाग्य आहे. क्रिकेट मोठ्या उंचीवर नेण्याचं श्रेय धोनीचं आहे. राहुल द्रविड हा कर्णधारपद सोडण्यासाठी आला असताना आपण सचिन तेंडुलकरला कर्णधारपद घेण्यास सुचवलं. पण सचिन तेंडुलकरने धोनीचं नाव सुचवलं. धोनीच्या भूमीत आल्याचा आपल्याला अभिमान आहे, असं शरद पवार म्हणाले.
युरोपात करोना प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर देशातही करोनाचे रुग्ण वाढत आहे. अशा संकटावेळी सरकारची जबाबदारी मोठी असते, असं पवार म्हणाले. महाराष्ट्राच्या विकासात झारखंड, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या नागरिकांचे योगदान आहे, असं पवारांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना थाळी वाजवण्यास सांगितलं. नागरिकांना जागरुक करण्याचं आवाहन केलं. पण आम्ही थाळी वाजवणारे नाही. त्या ताटात जेवण कसे मिळेल, याची चिंता करणारे आहोत, असा टोला शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.






