ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसुख हिरेन यांची पत्नी आणि मोठ्या मुलाने एटीसच्या कार्यालयात दाखल होत हा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर एटीएसने हे पाऊल उचललं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार ठाणे शहर पोलीस यांच्याकडून मनसुख हिरन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. भा द वि कलम 302,201,34,120 B प्रमाणे मयत यांच्या पत्नी विमला मनसुख हिरन यांच्या फिर्यादीवरून द वि प पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसुख हिरेन प्रकरणात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी धक्कादायक आरोप केला आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि वसईतील गुंड धनंजय गावडे यांचा संबंध असल्याचा आरोप करत दरेकर यांनी खळबळ उडवून दिली आहे. या गावडेवर अनेक गंभीर गुन्हे आहेत आणि त्याला सचिन वाझे पाठीशी घालत आहेत अशी आपल्याला माहिती मिळाली असल्याचं दरेकर यांनी म्हटलं आहे. हिरेन यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन वसई आहे, मग या सगळ्या प्रकरणात हिरेन, वाझे आणि गावडे यांचे काय कनेक्शन आहे याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यानंतर आलेल्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा झाला. मनसुख यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीरच्या लाल रंगाच्या खुणा आहेत. तसंच चेहऱ्याच्या डाव्या नागपुडीजवळ दीड सेटींमीटर बाय 1 सेंटीमीटरची लाल खुण आढळली. उजव्या डोळ्याजवळ उजव्या बाजूला कानाच्या दिशेने गडद लाल रंगाची खुण असल्याचंही शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे.






