नवी दिल्ली – भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या फेनी नदीवर बांधण्यात आलेल्या ‘मैत्री सेतू’ या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. हा ऐतिहासिक क्षण असल्याचे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्हिडीओ संदेशात म्हटले आहे.
आभासी सोहळ्यात मैत्री सेतूच्या उद्घाटनासोबतच पंतप्रधान मोदी यांनी त्रिपुरामधील अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी देखील केली. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मागील ३० वर्षे सत्तेत असलेले सरकार आणि गेल्या तीन वर्षांपासून सत्तेत असलेल्या ‘दुहेरी इंजिन’ सरकारमधील फरक त्रिपुरा राज्य अनुभवत आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार अर्थात ‘दुहेरी इंजिन’ सरकार असल्याने त्याचा फायदा या राज्याला होत असल्याचे पंतप्रधानांनी ठासून सांगितले. त्याचवेळी ज्या राज्यांमध्ये दुहेरी इंजिन सरकार नाही, त्या राज्यांमध्ये गरीब, शेतकरी व मुलींचे सबलीकरण करणारी धोरणे एकतर लागू केली गेली नाहीत किंवा खूपच कमी गतीने राबवली जात आहेत, अशी टीका देखील मोदी यांनी केली.
यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा व्हिडीओ संदेश प्रसारित करण्यात आला. त्यात त्या म्हणाल्या, ‘आम्ही भारतासोबत जोडले जाऊन दक्षिण आशियामध्ये एक नवीन पर्व तयार करत आहोत. आम्ही अशा प्रदेशात आहोत जेथे क्षेत्रीय व्यापाराची शक्यता खूपच कमी आहे. मला असे वाटते की, राजकीय सीमा व्यापारासाठी अडथळे बनू नयेत.’






