नंदीग्राम (पश्चिम बंगाल) – येथील निवडणुका तोंडावर आल्या आहेत. देशातील विविध राजकीय पक्ष येथील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. तसेच येथील निवडणूक प्रचारही शिगेला पोहचला आहे. अशातच नंदीग्राम येथील निवडणूक प्रचारादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांनी निवडणूक प्रचारातील पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यांना सध्या एसएसकेएम रुग्णालयात या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ममता बॅनर्जींनी हा हल्ला भारतीय जनता पक्षाकडून केला असल्याचा आरोप लावला आहे. परिणामी पश्चिम बंगालचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या अपघातानंतर ममता बॅनर्जी यांनी आपले नियोजित सर्व कार्यक्रमं रद्द केली आहेत. सध्या त्यांना ग्रीन कॉरीडॉर बनवून कोलकात्याला आणण्यात येत आहे. तसेच कोलकात्यातील दोन रुग्णालये ममता बॅनर्जीवर उपचार करण्यासाठी सज्ज झाली आहेत.
ममता बॅनर्जी यांच्या पायावरून गाडी घालण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप त्यांनी केला आहे. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून सतत वेदना होत आहेत. यावर स्थानिक डॉक्टरांनी उपचार केले असून पुढील उपचारासाठी त्यांना कोलकात्याला आणण्यात येत आहे. याप्रकरणी आता दोन्ही पक्षांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. भारतीय जनता पक्षाने याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तर निवडणूक आयोगानेही या घटनेचा सखोल तपशील मागितला आहे.
याप्रकरणी टीमसीच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे आपले सर्व दौरे आणि महत्त्वाचे कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. यामुळे याचा निवडणूक निकालावर गंभीर परिणाम होऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. असं म्हटलं जात आहे की, ममता बॅनर्जी कारचा दरवाजा उघडत असताना काही लोकांनी त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आहे. हा अपघात होता की आणखी काही? याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप समोर आली नाही. या घटनेचा तपास केला जात आहे.






