नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. ४ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश अशा एकूण ५ विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसमधील वरिष्ठ नेते पीसी चाको यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये आता लोकशाही राहिलेली नाही, असं राजीनामा दिल्यानंतर चाको म्हणाले.
आपण काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. पण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं वृत्त चाको यांनी फेटाळून लावलं आहे. कुठल्याही जातीयवादी पक्षात प्रवेश करण्याची कल्पनाही करू शकत नाही, असं चाको म्हणाले. केरळमध्ये ६ एप्रिलला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचा राजीनामा देण्याशिवाय आपल्यालाकडे कुठलाही पर्याय नव्हता, असं चाको यांनी स्पष्ट केलं.
माझ्या समोर एकच मार्ग होता. मी पक्षात कुठल्या पदावर नव्हतो आणि आपल्या कामावरही समाधानी नव्हतो. लोकशाही असलेल्या पक्षात असणं माझ्यासाठी समाधानाचं होतं. आधी आमचे विचार ऐकले जात होते. निर्णय घेण्यात येत असलेल्या नेत्यांमध्ये समावेश केला जात होता. हे समाधान अधिक चांगलं काम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा देत होतं, असं चाको म्हणाले.
चाको हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी भाजपध्ये अजिबात जाणार नाही. मी कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही. भाजपचा स्वीकारण मी कधीच करणार नाही. मी काँग्रेसमध्ये होतो. कारण काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. पण मी जातीयवादी पक्षात जाण्याची कल्पनाही करू शकत नाही, असं चाको यांनी स्पष्ट केलं.
केरळ काँग्रेसमध्ये अ आणि ब असे दोन गट पडले आहेत. दोघांनी आपले विधानसभा मतदारसंघ वाटून घेतले आहेत आणि उमेदवारांची निवड केली जात आहे. पण त्यांना तेवढी समज नाहीए, असं चाकोंनी सांगितलं.
आपण हायकमांड समोर सर्व समस्या मांडल्या. पण त्यावर काहीही समाधान झाले नाही. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडेही आपण तक्रार केली होती. त्यांनी समजून घेत केरळ काँग्रेसच्या नेत्यांना त्यावर लक्ष देण्यास सांगितलं होतं. पण तक्रारीच ऐकून घेतल्या जात नसतील तर त्याचा अर्थ काय समजायचा, असं पीसी चाको यांनी सांगितलं.






