महाआघाडीत सर्वकाही सुरळीत – शरद पवार

नवी दिल्ली – सचिन वाझे प्रकरण आणि त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला पोहोचणारी हानी यावरुन शरद पवार नाराज असल्याची चर्चा होती. शिवाय यावरुन महाविकास आघाडीमध्ये मतमतांतरे असल्याचंही म्हटले जात होते. मात्र महाविकास आघाडीत कोणतीही अडचण नाही. काही अडचणी येतात, त्यावर एकत्र मिळून तोडगा काढला जातो.सचिन वाझे प्रकरणाचा परिमाण महाविकास आघाडी सरकारवर होईल, यावर आमचा विश्वास नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

ठाकरे सरकार सुरळितपणे काम करत आहे. महाविकास आघाडीत कधी समस्या येतात मात्र त्या चर्चेने सोडविल्या जात असल्याचे पवार म्हणाले.केरळमधील काँग्रेसचे नेते पी.सी. चाको यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदि उपस्थित होते.

सचिन वाझे प्रकरणावर शरद पवार म्हणाले की, एका पोलीस अधिकाऱ्याच्या तपासाचा परिणाम सरकारवर होईल यावर आमचा विश्वास नाही. एनआयए याचा तपास करत आहे. त्यावेळी आमचं काम आहे त्यांची मदत करणे. ज्या लोकांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, त्यांना त्याची जागा दाखवणं यासाठी एनआयए तपास करणार यात काहीही चुकीचं नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीविषयी बोलताना ते म्हणाले की, आम्ही कायमच भेटतो आणि बोलतो. वेगवेगळ्या मुद्द्यांवर आमच्यात चर्चा होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here