सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये दोन गटामध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली आहे. तलवारी आणि लाठ्या काठ्याने दोन गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला केला. यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 2 जण जखमी झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील नरवणे येथे आज सकाळी ही घटना घडली. तहसीलदारांनी जप्त केलेल्या वाळुचा लिलाव घेतला होता. हा लिलाव मयत चंद्रकांत जाधव यांना मिळाला होता. याचा राग जाधव यांच्या भावकीतील लोकांना होता. आज सकाळी याच कारणावरून दोन्ही गटात बाचाबाची झाली आणि त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.
दोन्ही गटामध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर तलवारी आणि लाठ्या काठ्याने हल्ला चढवला. या धुमश्चक्रीमुळे गावात एकच गोंधळ उडाला होता. या मारहाणीमध्ये विलास धोंडिबा जाधव आणि चंद्रकांत नाथाजी जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
तर विशाल जाधव, विश्वास जाधव हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.






