कोलकाता – एका बावीस वर्षीय तरुणीनं आपल्या वडिलांना हॉटेलमध्ये घेऊन जात त्यांना जेवण खाऊ घातलं. तिनं वडिलांना दारूही पाजली आणि यानंतर क्रूरतेनं त्यांची हत्या केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं,की ही तरुणी रविवारी रात्री आपल्या वडिलांसोबत रात्रीचं जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. इथेच तिनं आपल्या वडिलांना दारू पाजली. यानंतर हे दोघंही स्टॅण्ड रोडवरील चडपाल घाटावर फिरण्यासाठी गेले.
पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की जेव्हा तरुणीचे 56 वर्षीय वडील हुगली नदीच्या काठावर झोपले तेव्हा तिनं वडिलांवर रॉकेल ओतून त्यांना जिवंत जाळलं. पोलिसांनी सांगितलं, की ही संपूर्ण घटन सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आणि महिलेनंही आपला गुन्हा मान्य केला. पोलिसांनी सांगितलं, की पार्क सर्कसजवळील क्रिस्टोफर रोड येथील रहिवासी असलेल्या या आरोपी महिलेला तिच्याच नातेवाईकाच्या तक्रारीनंतर अटक करण्यात आलं आहे.
अधिकाऱ्यानं सांगितलं की, महिलानं याच कारण सांगताना म्हटलं, की जेव्हा ती लहान होती तेव्हाच तिच्या आईचा मृत्यू झाला. यानंतर तिचे वडील तिच्यावर अत्याचार करू लागले. मात्र, महिलेच्या लग्नानंतर या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. परंतु, काही कारणांमुळे महिलेचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. ती जेव्हा घरी पुन्हा माघारी आली, तेव्हा हेच सत्र पुन्हा सुरू झालं. याच गोष्टीला कंटाळून आपण हे पाऊल उचलल्याचं महिलेनं सांगितलं. पोलिसांनी सांगितलं, की महिलेनं केलेल्या दाव्यांचा तपास केला जात आहे. तिला न्यायालयात हजर केलं गेलं. न्यायालयानं तिला 29 मार्च मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं आहे.







