नवी दिल्ली – जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढती या हायव्होल्टेज होतात. या लढती फक्त दोन देशातील चाहते नव्हे तर अन्य देशातील क्रिकेट चाहते पाहत असतात. गेल्या काही वर्षात या दोन्ही देशातील क्रिकेट सामने झाले नाहीत. राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका झाल्या नाहीत. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध लढतात. पण आता दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. त्यामुळेच जवळ जवळ १० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने झाले नाहीत. या दोन्ही देशात २००७ साली अखेरची द्विपक्षीय मालिका झाली होती. तेव्हा पाकिस्तानने पाच वनडे आणि तीन कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौरा केला होता. पण २००८ साली मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले. त्यानंतर पाकिस्तान संघ २०१२-१३ साली मर्यादित षटकाची छोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. पण दहशतवादी हल्ल्याने संबंध पुन्हा बिघडले.
आता पुन्हा एकदा दोन्ही देशातील क्रिकेट सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनुकुल वातावरण तयार होत आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही देशात पुन्हा एकदा क्रिकेट सुरू होऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देशातील सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली आहे. नियोजित योजनेनुसार जर सर्व काही ठीक झाले तर या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका होऊ शकते.
पाकिस्तानमधील आघाडीचे उर्दू वृत्तपत्र असलेल्या ‘डेली जंग’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तात पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली.
आम्हाला द्विपक्षीय मालिकेसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. दोन्ही देशातील द्विपक्षीय मालिकेची चर्चा भारतीय मीडियात देखील सुरू आहे. सर्व काही ठीक झाले तर या वर्षी दोन्ही संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका होऊ शकते. या वर्षाच्या दुसऱ्या सत्रात ही मालिका खेळवण्याचा विचार असल्याचे वृत्तात म्हटले आहे.






