अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून, महापालिकेने नियमांचे उल्लंघन करणाऱयांकडून आठ दिवसांत तब्बल सव्वा लाखाचा दंड वसूल केला.
नगर शहरासह जिह्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढू लागली. कोरोनाच्या या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना नियमांचे प्रभावी पालन व्हावे, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर आणि मास्कचा वापर व्हावा, गर्दी नियंत्रणात यावी, यासाठी महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत.
मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या अधिपत्याखाली चार कोरोना दक्षता पथकांची नियुक्ती केली. या पथकांनी 17 मार्चपासून नियम मोडणाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला. 17 ते 25 मार्च या कालावधीत पथकांनी 226 नागरिकांवर सोशल डिस्टन्स नसणे, मास्कचा वापर न करणे, गर्दी केल्याप्रकरणी तब्बल एक लाख 25 हजारांचा दंड वसूल केला.
पथकप्रमुख परिमल निकम, संतोष लांडगे, कल्याण बल्लाळ, शशिकांत नजान यांच्या पथकाने शहरातील कापड बाजार, प्रोफेसर चौक, भिस्तबाग चौक, पाइपलाइन रोड, प्रोफेसर चौक, चितळे रोड, दाळमंडई, माळीवडा, टिळक रोड, वाडिया पार्क, जुना बाजार, झेंडीगेट, केडगाव, नवी पेठ, दिल्लीगेट, बोल्हेगाव, सावेडी, बालिकाश्रम रोड, भूतकरवाडी, सर्जेपुरा, गंजबाजार, बुरुडगाव रोड, भाजी मार्केट, मार्केटयार्ड आदी भागांतील दुकाने व सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई केली.






