अररिया ( बिहार) – येथून जवळच असलेल्या कवैया गावात एकाच कुटुंबातील सहा मुलांचा आगीत जळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चिमुकल्यांचे वय अडीच ते पाच वर्षे होते. ही भावंडे घरातील एका रुममध्ये कणीस भाजत होते, यावेळी रुममध्ये ठेवलेल्या चाऱ्याला आग लागली आणि या घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे अफसर (5), गुलनाज (2.5), दिलबर (4), बरकस (3), अली हसन (4) आणि खुशनेहा (2.5) आहे. कुटुंबातील सदस्य अली हसन यांनी सांगितले की, मुले कणीस भाजत होती, त्या रुममध्ये अचानक आग लागली. आगीमुळे रुममध्ये किती मुले आहेत, हेदीखील आम्हाला समजले नाही. आग विझवल्यावर दिसले सहा जणांचे मृतदेह.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मुले कणीस भाजत होते त्या ठिकाणी वाळलेला चारा ठेवला होता. या चाऱ्यामुळे आग वेगाने पसरली. आम्ही आमच्या पद्धतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्नीशमन दलाची गाडीदेखील अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाली. आग लवकर आटोक्यात आणल्यामुळे गावात पसरू शकली नाही. सरकारने मृत मुलांच्या कुटुंबाला 4-4 लाख रुपये नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.






