वर्धा (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरेशी) – घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी गावात लागलेल्या भीषण आगीत पाच घरांसह गुरांचे गोठे जळून बेचिराख झाले. आगीत गृहोपयोगी साहित्यासह लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी टळली. आगीची ही गंभीर घटना आज बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
भगवान साखरकर, पुजारी साखरकर, दुर्गा टेकाम, वसंत पवार, सुर्यभान कोहरे सर्व रा. पार्डी नस्करी अशी आगीत घरे जळून खाक झालेल्या नागरिकांची नावे आहेत. पार्डी नस्करी या गावात मध्यवस्तीत संबंधितांची घरे आहेत. आज सकाळी अचानक एका घराला आग लागली. ही घटना लक्षात न आल्याने पाहता-पाहता या आगीने आजुबाजूची पाच घरे कचाट्यात घेतली. आगीचे लोळ उठू लागल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर मिळेल त्या साहित्याने नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न केले. तब्बल दोन तास ही आग धुमसतच होती
त्यानंतर आग विझविण्यात स्थानिक नागरिकांना यश आले. मात्र तोवर या आगीत घरे, गृहोपयोगी साहित्य, धान्य असा लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला होता. या घटनेची माहिती मिळताच घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे पथकासमवेत तेथे दाखल झाल्या. यावेळी त्यांनी जळालेल्या पाचही घरांची पाहणी केली. त्यानंतर महसूल पथकाने पंचनामा केला. तसेच आगीने झालेल्या नुकसानीचा अहवालही तयार केला. यावेळी तहसीलदार माटोडे यांनी घरे जळालेल्या नागरिकांना धीर देत शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.



