नवी दिल्ली – महाराष्ट्राला लस कमी पडणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिली. केंद्राकडून महाराष्ट्राला एक कोटी सहा लाख कोरोना प्रतिबंधक लसचा पुरवठा आधीच झाला आहे. हा पुरवठा झाल्याची माहिती देणारे ट्वीट महाराष्ट्र शासनाच्यावतीने डीजीआयपीआरकडून ६ एप्रिल रोजी करण्यात आले. केंद्राने पाठवलेल्या लसपैकी पाच लाख लस महाराष्ट्राने वाया घालवल्या. केंद्राकडून महाराष्ट्राला ९ ते १२ एप्रिल दरम्यान आणखी लसचा साठा पुरवला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रात लसटंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिल्याचे रामदास आठवले म्हणाले.
लसीकरणासाठी प्राधान्यक्रम केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील बैठकीत ठरले आहेत. या निर्णयानुसार आधी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना नंतर फ्रंटलाइन वर्कर्सना यानंतर इतर ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय झाला आहे. नियोजनानुसार सर्वात आधी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना पहिला डोस देण्याची मोहीम पूर्ण होणे अपेक्षित होते. ही मोहीम सुरू असतानाच फ्रंटलाइन वर्कर्सना पहिला डोस देण्याची प्रक्रिया सुरू होणार होती. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे दोन्ही डोस देण्याची प्रक्रिया आधी पूर्ण होईल पाठोपाठ फ्रंटलाइन वर्कर्सची दोन्ही डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर ४५ आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना दोन्ही डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. पण महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातील लसीकरण अद्याप पूर्ण झालेले नाही. राज्य सरकार लसच्या टंचाईविषयी बोलत आहे. प्रत्यक्षात राज्याकडे लसींचा साठा आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला ९ ते १२ एप्रिल दरम्यान आणखी लसचा साठा पुरवला जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रात लस टंचाई निर्माण होणार नाही. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनीच ग्वाही दिल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासन लसचा तुटवटा निर्माण झाल्याचे सांगत आहे. पण यात तथ्य नाही, असे रामदास आठवले म्हणाले. लसीकरण कशा प्रकारे सुरू आहे याचा आढावा घेऊन आधीच्या लस संपण्याआधीच केंद्राकडून राज्याला आणखी लस देण्याचे नियोजन आहे. यामुळे लसची टंचाई निर्माण होणार नाही, रामदास आठवले म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीशी आहे. महाराष्ट्राच्या लस मिळत आहे आणि आवश्यकतेनुसार मिळत राहील. राज्यमंत्री म्हणून मी स्वतः यावर लक्ष ठेवून आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.






