पाटणा (बिहार) – लग्नासाठी मुलगी पसंत नाही म्हणून एका तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीची अमानुषपणे हत्या केली. संबंधित घटना ही बिहारच्या नालंदा येथे घडली आहे. आरोपी तरुणाने मुलीचे हात-पाय बांधून तिचा गळा चिरडला. त्यानंतर कुणाला माहित पडू नये म्हणून तिचा मृतदेह गवताच्या पेंढीत लपवला. मात्र, गवताच्या पेंढीत जेव्हा तिचा मृतदेह गावकऱ्यांना सापडला तेव्हा द्वारिका बिगहा गावात एकच खळबळ उडाली
नालंदातील नूरपूर गावचा तरुण आझाद कुमार याचं 19 वर्षीय तरुणी खुशबू हीच्यासोबत लग्न ठरलं.17 फेब्रुवारीला दोघांचं लग्न ठरलं होतं. 20 जूनला त्यांचं लग्न होणार होतं. मात्र, त्याआधीच आझादने आपल्या होणाऱ्या पत्नीची हत्या केली. खुशबूच्या वडिलांनी आझाद कुमारवर त्यांच्या मुलीच्या हत्येचा आरोप केला. “माझी मुलगी आझाद कुमारला पसंत नव्हती. त्यामुळे त्याने आधी फोन करुन तिला घरी बोलवलं. त्यानंतर गळा चिरुन तिची हत्या केली”, असा आरोप त्यांनी केला आहे.
17 फेब्रुवारीला झालेल्या कार्यक्रमात आझादचे मित्रही आले होते. त्या मित्रांनी मुलीची उंची कमी आणि बारीक असल्याचं आझादला सांगितलं होतं. त्यामुळे आझादला देखील हे लग्न नको होतं. मात्र, कुटुंबियांच्या दबावापुढे तो नकार देऊ शकला नाही. तरीही त्याने मुलीला घरी बोलवून तिची गळा चिरुन हत्या केली, असं खुशबूच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.
आझादचा रात्री दहा वाजता खुशबूला फोन आला. ती सोबत आपल्या चुलतीचा मोबाईल घेऊन गेली होती, अशी माहिती मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिली. तसेच आझाद हा खुशबूला गेल्या कित्येक दिवसांपासून भेटण्यासाठी बोलवत होता, अशीही माहिती मुलीच्या वडिलांनी दिली
मुलीचा मृतदेह गवताच्या पेंढीत मिळाल्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. याशिवाय मुलीच्या कुटुंबियांनादेखील याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी मुलीच्या कुटुंबियांनी टाहो फोडला. त्यांचा आक्रोश बघून सर्व गावकऱ्यांचे डोळे पाणावले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलीला न्याय मिळवून देऊ, असं आश्वासन कुटुंबियांना दिलं. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर मृतदेह मुलीच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.






