शेतकऱ्याकडून लाच स्वीकारणाऱ्या तहसीलदारासह सहायक जाळ्यात

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – शेतकऱ्याकडून ७० हजाराची लाच स्वीकारणाऱ्या गंगापूरमधील तहसीलदार अविनाश महादेव शिंगटे आणि महसूल सहायक अशोक बाबुराव मरकड (५५) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. वडिलोपार्जित जमिनीच्या सातबाऱ्यावरील कूळ कायद्याप्रमाणे बेकायदेशीर शेरा कमी करुन व्यवहार करण्यासाठी ही लाच मागितल्याचा आरोप आहे.

आपेगावातील (ता. गंगापूर) शेतकऱ्याची जमीन, गट क्रमांक १९ मध्ये आहे. तिचा बेकायदेशीर शेरा कमी करुन व्यवहार करण्यासाठी दोघांनी एक लाख २५ हजाराच्या लाचेची मागणी केली होती. त्या विरोधात शेतकऱ्याने तक्रार दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचेचा पहिला हप्ता म्हणून दोघांनी ७० हजारांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.

त्यावरुन दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक मारुती पंडित, निरीक्षक विकास घनवट, पोलिस नाईक प्रकाश घुमरे, भूषण देसाई, शिपाई मिलिंद इप्पर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here