पाटना (बिहार) – बकरी चोरीच्या आरोपातून दोन महिला आणि दोन युवकांना अमानुष वागणूक दिल्याची एक संतापजनक घटना समोर आली आहे. बकरी चोरल्याचा आरोप करत जमावाने दोन महिला आणि दोन युवकांना बेदम मारहाण केली आहे. संबंधित जमाव एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यांनी दोन्ही महिलांचं मुंडण केलं आहे. यानंतर आरोपींनी महिल्यांच्या डोक्यावर शेणांन माखलं आहे. विशेष म्हणजे या घटनेची माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी नाकर्तेपणा दाखवला असून आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही.
संबंधित घटना बिहारमधील कटिहार येथील आहे. येथील दोन महिला आणि दोन युवकांना गावातील जमावानं पकडलं आणि त्यांच्यावर बकरी चोरीचा आरोप लावला. यानंतर या चौघांची जमावाने बेदम मारहाण केली. हे चारही पीडित जमावाकडे जीवाची भीक मागत होते. पण हल्लेखोरातील कोणालाही त्यांची दया आली नाही. त्यांनी पीडित चौघांनाही लाथा बुक्क्यांनी जबरी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी संबंधित दोन महिलांच मुंडन केलं आणि त्यांच्या डोक्यावर शेण थापलं.
शिवाय या घटनेचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडित महिला आणि युवक आरोपींकडे आपल्या जीवाची भीक मागताना स्पष्टपणे दिसत आहे. सर्व जमाव बदलेच्या भावनेतून त्यांना मारहाण करत आहेत. यावेळी काहींनी आपल्या मोबाईलमध्ये घटनेचं चित्रीकरण केलं आहे.
झी न्युजने दिलेल्या वृतानुसार, पीडित दोन्ही महिला काटिहार जिल्ह्याच्या मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. या घटनेचा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही पावलं उचलली नाही. या प्रकरणी त्यांनी अद्याप कोणत्याही आरोपीवर कारवाई केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.






