ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – वसई विरारमध्ये मागील दोन दिवसांपासून ऑक्सिजनचाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णालयातील उपचार घेत आलेल्या रुग्णाचा मृत्यू होत असल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी असा आरोप केला आहे. सोमवारी या परिसरात वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असणाऱ्या 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्व मृत्यू हे ऑक्सिजन न मिळाल्याने झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नालासोपारा याठिकाणी असणाऱ्या आचोळे परिसरातील विनायका रुग्णालयातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर नालासोपारा रीद्धीविनायक रुग्णालयात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू कृष्णा रुग्णालयात झाला असून इतर दोन वसईच्या ग्रामीण भागात दगावले असल्याची माहिती मिळते आहे. हे सर्व रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने दगावल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. एकीकडे रेमडिसिव्हीरचा अभाव राज्यात सर्वत्र असताना आता ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागल्याने प्रशासन कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्याबाबतीत गंभीर आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विनायका रुग्णालयाकडून अशी माहिती मिळते आहे की, त्यांनी महानगर पालिकेला याआधी पत्राद्वारे अशी माहिती दिली होती की त्यांच्याकडे ऑक्सिजनची कमतरता आहे. विनायका रुग्णालयामध्ये एकाच दिवशी सात जणांचा मृत्यू हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा असल्याचीही माहिती समोर येते आहे.
रिद्धी विनायक रुग्णालयाच्या प्रशासनाने ऑक्सिजनमुळे मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की त्यांचा स्वत:चा ऑक्सिजन प्लँट असल्यामुळे ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाल्याचा दावा खोटा आहे.






