नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशावेळी अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडा भासतोय. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, कोरोना लसीबाबत एका माहितीच्या अधिकारातून धक्कादायक बाब समोर आली आहे. एकीकडे कोरोना लसीचा तुटवडा भासत असताना, दुसरीकडे 11 एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात एकूण 10.34 कोटींपैकी तब्बल 44.78 लाख डोस वाया गेले आहेत. राजस्थानमध्ये सर्वाधिक 6 लाख 10 हजार 551 डोस खराब झाले. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 5 लाख 4 हजार 724, उत्तर प्रदेशात 4 लाख 99 हजार 115 आणि महाराष्ट्रात 3 लाख 56 हजार 725 डोस वाया गेले आहेत.
कोणत्या राज्यात किती डोस वाया गेले?
आंध्र प्रदेश – 1 लाख 17 हजार 733, आसाम – 1 लाख 23 हजार 818, बिहार – 3 लाख 37 हजार 769, छत्तीसगढ़ – 1.45 लाख, दिल्ली – 1.35 लाख, गुजरात – 3.56 लाख, हरियाणा – 2 लाख 46 हजार 462, जम्मू-कश्मीर – 90 हजार 619, झारखंड – 63 हजार 235, कर्नाटक – 2 लाख 14 हजार 842, लडाख – 3 हजार 957, मध्य प्रदेश – 81 हजार 535, महाराष्ट्र – 3 लाख 56 हजार 725, मणिपुर – 11 हजार 184, मेघालय – 7 हजार 673, नागालैंड – 3 हजार 844, ओडिशा – 1 लाख 41 हजार 811, पुद्दुचेरी – 3 हजार 115, पंजाब – 1 लाख 56 हजार 423, राजस्थान – 6 लाख 10 हजार 551, सिक्किम – 4 हजार 314, तमिलनाडू – 5 लाख 04 हजार 724, तेलंगाना – 1 लाख 68 हजार 302, त्रिपुरा – 43 हजार 292, उत्तर प्रदेश – 4 लाख 99 हजार 115, उत्तराखंड – 51 हजार 956
टक्केवारीच्या हिशेबाने विचार करायचा झाला तर तामिळनाडूमध्ये 12.10 टक्के, हरियाणात 9.74 टक्के, पंजाबमध्ये 8.12 टक्के, मणिपूरमध्ये 7.80 टक्के, तेलंगणात 7.55 टक्के डोस वाया गेले आहेत. तर केरळ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोराम, गोवा, दीव-दमण, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपमध्ये डोस वाया गेले नाहीत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतोय. अशावेळी रेल्वे मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेत रेल्वेद्वारे अन्य राज्यांमध्ये महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार काल पहिल्या ऑक्सिजन एक्सप्रेसला परिवहन मंत्री अनिल परब यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.
राज्याला विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ काल रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन काल पहिली रेल्वे रवाना केली. अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवून रवाना केले.






