नवी दिल्ली – दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे चोवीस तासांत 25 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे आणखी असंख्य रुग्णांचा जीव धोक्यात आला असल्याची माहितीदेखील रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सर गंगाराम रुग्णालयात दाखल असलेल्या अतिगंभीर रुग्णांपैकी २५ रुग्णांचा अवघ्या चोवीस तासांत मृत्यू झाला आहे. रुग्णालयात केवळ काही तास पुरेल, इतकाच ऑक्सिजनचा साठा आहे. रुग्णालयातील व्हेंटिलेटर्स तसेच बायपॅप मशिन्स व्यवस्थितपणे चालत नसल्याची तक्रार डॉक्टरांनी केली आहे. रुग्णालयातील गंभीर परिस्थिती पाहून अतिदक्षता विभागात रुग्णांना मॅन्युअल व्हेंटिलेशन दिले जात आहे.
रुग्णलयातील अधिकाऱ्यांच्या माहीतीनुसार मागच्या २४ तासांत २५ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पुर्ण रुग्णालयाला दोन तास पुरेल इतकात साठा शिल्लक आहे. याचबरोबर मॅन्युअल व्हेंटिलेशनच्या साहाय्याने काम सुरू आहे. ते म्हणाले की रुग्णालयाची स्थिती अत्यंत बिकट होत चालली आहे. दरम्यान अजून ६० जणांचा जीव जाण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.






