लग्नाला जाण्यावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीसह १३ महिन्यांच्या मुलाची केली हत्या

murder

जयपूर (राजस्थान) – येथील पेशाने शिक्षक असलेल्या दाम्पत्यामध्ये लग्नाला जाण्यावरून टोकाचा वाद झाला. त्यामुळे पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नीची आणि १३ महिन्यांच्या मुलाची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन जीवन संपवले.

जयपूरमधील प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पती-पत्नी दोघेही शिक्षक होते. शिक्षक गिर्राज मीणा या परिसरात भाडेतत्वावर घेतलेल्या घरात आपल्या कुटुंबीयांसह राहत होते. बूंदी येथील केंद्रीय विद्यालयात ते शिक्षक होते. सुट्टीच्या दिवसांत ते घरी येत होते. त्यांची पत्नी समिता मीणा या देखील शिक्षिका होत्या. त्या जयपूरच्या सेंट्रल स्कूलमध्ये शिकवायच्या. त्यांना १३ महिन्यांचे मूल होते.

मिळालेल्या माहितीनुसार, समिता मीणा यांच्या मामाच्या मुलाचे लग्न होते. या लग्नाला यावे असा आग्रह तिच्या कुटुंबीयांनी धरला होता. मात्र, तिचे पती गिर्राज हे या लग्नाला जायला तयार होत नव्हते. त्यांनी पत्नी समिता यांनाही लग्नाला जाऊ नकोस असे सांगितले होते. यावरून काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये खटके उडत होते. त्याचवेळी गुरुवारी संध्याकाळी पती-पत्नीमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. त्यानंतर गिर्राज यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

पत्नी आणि मुलाच्या हत्येनंतर गिर्राज यांनीही स्वतः गळफास घेऊन आयुष्य संपवले. समिताच्या वडिलांनी फोन केल्यानंतर काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. समिताच्या वडिलांनी घरमालकाला फोन करून विचारणा केली. त्यांनाही घरात शांतता असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घरात पाहणी केली असता, तिघांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरू केला आहे. फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here