अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना, तसेच करोना बाधित रुग्णांचे नातेवाईक ही इंजेक्शन मिळावी म्हणून जंगजंग पछाडत असताना रेमडेसिविर इंजेक्शनबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले असल्याचे वृत्त आहे. घडलेल्या या प्रकारानंतर अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवावा असे आदेश दिले आहेत.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यासाठी एकूण ५०० रेमडेसीवीर इंजेक्शन उपलब्घ झाले होते. त्यांपैकी एकूण १२० कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करण्यात आला होता. या रुग्णांपैकी ९० जणांवर या इंजेक्शनमुळे दुष्परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले अशआ रुग्णांमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर थंडी आणि ताप आल्याचे दिसले. इतक्या मोठ्याप्रमाणावर रुग्णांना दुष्परिणाम जाणवल्याने आता अन्न आणि औषध प्रशासनाने संपूर्ण रायगड जिल्ह्यातच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्यात यावा असे आदेश दिले आहेत. रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
आतापर्यंत कोरोनाच्या उपचारात रेमडेसिविर इंजेक्शन मोठा वापर करण्यात येत आहे. तुटवडा असल्याने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा मोठ्याप्रमाणावर काळाबाजार होताना दिसत आहे. लोक रेमडेसिवीर मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, रायगडमध्ये घडलेल्या या नव्या प्रकारामुळे आता रेमडेसिविरचा वापर करावा की न करावा हा नवा प्रश्न निर्माण झाला आहे.






