संगमनेरमध्ये गर्दी का केली? असा सवाल विचारणाऱ्या पोलिसांनाच मारहाण; जमावाची दगडफेक

संगमनेर (प्रतिनिधी) – कोरोना काळात लोकांच्या संरक्षणासाठी आणि सरकारने लागू केलेल्या नियमांचं पालन व्हावं याकरता पोलीस अधिकारी आज रस्त्यावर उभे आहेत. दिवस रात्र एक करून त्यांना त्यांची ड्यूटी निभावावी लागत आहे. मात्र देशभरातून अशा घटना समोर येत आहेत की ज्यामुळे डोळ्यात अंजन घालून सामान्य जनतेचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांनाच संरक्षणाची गरज आहे की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक या फ्रंटलाइन वर्कर्सवर हल्ला करण्यास देखील मागेपुढे पाहत नाही आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर शहरातून देखील अशीच एक घटना समोर आली आहे.

संगमनेर याठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे काही काळासाठी शहरात तणावाचं वातावरण होतं. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना केली आहे. काही तरुण पोलिसांचा पाठलाग करत असल्याचं समोर आलेल्या व्हिडीओतून दिसत आहे. शिवाय या जमावाने सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याचंही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं आहे. यावेळी पोलिसाला मारहाण देखील करण्यात आली. संगमनेरमध्ये जमावाकडून अशाप्रकारचं कृत्य घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संगमनेर शहरात असणाऱ्या दिल्ली नाक्याजवळ ही घटना घडली आहे.

याठिकाणी पोलीस कर्मचारी लॉकडाऊन काळात लागू करण्यात आलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावं याकरता गस्त घालत होते. त्यावेळी मारहाण आणि दगडफेकीची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जमावबंदीचे आदेश असताना गर्दी का केली, असा सवाल पोलिसांनी विचारला असता संतप्त जमावाने हल्ला केला. गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणात सहा जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये जमावाचा क्रोध पाहायला मिळतो आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here