पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून काही युवकांनी फिल्मी स्टाइल राडा घातला आहे. जमिनीच्या वादातून त्यांनी चक्क एक कार पेटवून दिली आहे. जमिनीच्या वादाबाबत बोलणी सुरू असतानाच काही अज्ञात युवकांनी घटनास्थळी जाऊन कारच्या काचा लोखंडी हत्यारानं फोडून कारला आगीच्या भक्ष्यस्थानी केलं आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात चार अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
संबंधित घटना शिक्रापूरनजीक असणाऱ्या वढू बुद्रुक याठिकाणी घडली आहे. येथील एका जमिनीवरून पांडुरंग गायकवाड आणि छुगेरा यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा धोका निर्माण होईल, अशी माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हवालदार पंडित मांजरे हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान वादाच्या ठिकाणापासून काही अंतर दूर उभ्या असलेल्या कारला लाग लागल्याचं हवालदार मांजरे यांना दिसलं. त्यानंतर मांजरे यांच्यासह अनेकजण पेटत्या कारकडे धावून गेले.
या सर्वांनी कारला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. या आगीमुळे कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. काही अज्ञात तरुणांनी कारच्या काचा लोखंडी हत्यारानं फोडून कार पेटवून दिली आहे. एकीकडे जमिनीच्या वादाबाबत बोलणी सुरू असताना अशाप्रकारे कार पेटवून दिल्यानं घटनास्थळी बराच गोंधळ उडाला होता. पण घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलीस हवालदाराने तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.
याप्रकरणी पोलीस हवालदार पंडित संपतराव मांजरे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी चार अज्ञात युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी आणि हवालदार प्रशांत गायकवाड करत आहेत.






