गुरदासपूर (पंजाब) – मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन जगभर साजरा केला जातो. अनेक मुलांनी मातांना खास भेट देऊन त्यांच्याकडून आशीर्वाद घेत हा दिवस साजरा केला. पण, हा दिवस पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात राहणाऱ्या आईसाठी इतका वेदनादायक होता की, ती हा दिवस आयुष्यभर ती कधीच विसरणार नाही. कारण या दुर्दैवी आईला आपल्या एकुलत्या एका मुलाच्या तिरडीला खांदा द्यावा लागला. या हृदयद्रावक घटनेने पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले. “हे देवा, कोणत्याही आईच्या नशिबी असा दिवस येऊ देऊ नको,” असे सर्वजण म्हणत होते. पण त्याच वेळी आपला मुलगा देशाच्या रक्षणार्थ सीमेवर असताना त्याला मरण आलं याचा त्या आईला सार्थ अभिमानही आहे, असं ती सांगते.
खरं तर, 15 दिवसांपूर्वी 25 एप्रिलला 21 पंजाब रेजिमेंटचे वीर जवान 24 वर्षीय परगट सिंग सियाचीनमध्ये बर्फवृष्टी आणि वादळाच्या तडाख्यात सापडले होते. तेथे ते गंभीर जखमी झाले होते. शनिवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर रविवारी मातृदिनालाच त्यांचा तिरंग्यात लपेटलेला मृतदेह त्यांच्या गावात पोहोचला. त्यावेळी आई सुखविंदर कौर, बहीण किरनदीप आणि अमनदीप जोरजोरात रडत होत्या. हा प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यानंतर जवान परगट यांच्यावर संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आई आणि बहिणींनी अत्यंत शोकाकुल वातावरणात परगट यांच्या डोक्याला सुशोभित केले आणि अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत नेले. रडत असताना आई म्हणाली, ‘ परगट सानू किते नहीं छड्ड के गया, मुड़ आएगा मेरा पुत्तर’ यानंतर वडील प्रीतम सिंह यांनी मुखाग्नी दिला.
परगट हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता आणि अद्याप त्याचे लग्न झाले नव्हते. जवानाला दोन बहिणी आहेत, ज्या विवाहित आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2020 मध्ये तो त्याची धाकटी बहीण अमनदीप कौरच्या लग्नासाठी घरी आला होता. यानंतर कोरोनामुळे तो रजेवर आला नव्हता. परंतु, लवकरच तो घरी परत येणार होता. पण त्याआधी त्याच्या वीरगतीची बातमी घरी येऊन पोहोचली.
शहीद परगट सिंगच्या वडिलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा परगट 3 वर्षांपूर्वी सैन्यात भरती झाला होता. त्याला लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची आवड होती. तो म्हणायचा की, मी काम करीन तर सैन्यातच. नाहीतर, मी घरीच ठीक आहे. जेव्हा-जेव्हा तो सैन्यातून सुट्टीवर येत असे, तेव्हा तो गावातील मुलांना शारीरिक तंदुरुस्ती टिकवण्याविषयी आणि सैन्यात जाण्यासाठी प्रवृत्त करत असे. ग्रामस्थ म्हणाले की, या वीरपुत्राचा आम्हाला अभिमान आहे.






