यवतमाळ (क्राइम रिपोर्टर आसिफ कुरैशी) – तालुक्यातील चिकणी (कसबा) येथे मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने तिच्या वडिलाने मुलीसह जावयावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सागर काशीनाथ अंभोरे (२६) व शुभांगी (२६) हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे दाखल करण्यात आले.’ऑनर किलिंग’च्या या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
चिकणी (कसबा) येथील सागरचे गावातील शुभांगीवर प्रेम जडले. त्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये सहमतीने आंतरजातीय विवाह केला. त्यांच्या लग्नाला आता पाच वर्ष झाली. दोघांचा संसार सुरळीत सुरू असताना शुभांगीचे वडील दादाराव माटाळकर यांचा या प्रेमविवाहाला सुरुवातीपासूनच विरोध होता. मुलीने गावातील तरूणासोबतच प्रेमविवाह केल्याने ते कुटुंबासह आर्णी येथे स्थायिक झाले होते.
रविवारी सायंकाळी ६.३० वाजता दादाराव माटाळकर याने शुभांगी व सागर यांना ठार मारण्याच्या उद्देशाने गावी चिकणी (कसबा) येथे जाऊन चाकुने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सागरचे काका नारायण नानाजी अंभोरे यांनी दादाराव माटाळकर याच्याविरोधात आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी दादारावविरूद्ध भादंवि ३०७, ४५० तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन करीत आहे. या घटनेने गावात ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.






