औरंगाबाद येथे आर्थिक वादातून रिक्षाचालक युवकाचा चाकूने भोसकून खून

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – आर्थिक वादातून रिक्षाचालक तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. नारेगाव परिसरातील दर्गा मशिदीसमोरील रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. शेख वसीम शेख फरीद उर्फ शाहरुख (२७, रा. नारेगाव) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

वसीम हा, शेख असिफ शेख मुसा याच्या भावाकडे असलेली रिक्षा चालवत होता. गेल्या काही दिवसांपासून वसीम आणि आसिफ यांच्यामध्ये आर्थिक वाद सुरू होते. शनिवारी रात्री साडेदहाला वसिमने घरात मित्राला भेटून येतो म्हणून सांगितले. तो बाहेर पडला मात्र, घरी पोहोचलाच नाही. आसिफ याच्यासोबत तो बाहेर गेल्याचे परिसरातील नागरिकांनी पाहिले होते. या दोघांमध्ये वाद झाल्याने आसिफने त्याला चाकूने भोसकून जखमी केले होते. ही माहिती मिळताच परिसरात मोठा जमाव जमला होता.

जखमी वसीमला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी रविवारी एमआयडीसी सिडको पोलिसांनी आसेफसह त्याच्या अन्य दोन भावंडांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणांमध्ये आसिफनेच हत्या केल्याचे समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शेख आसीफ शेख मुसा, शेख जब्बार शेख सत्तार आणि शेख रईस शेख मुसा या तिघांच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिीक्षक विठ्ठल पोटे तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here